मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जमीन खरेदी अनुदान योजनेंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र आणि राज्य सरकारने 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
मात्र, या योजनेतील काही घरकुल लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुल लाभापासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अनुदान योजना सुरू केली आहे.